
शिक्षकांनी टीईटी बाबत अस्वस्थ होऊ नये
शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांचे आवाहन
लोकमराठी News, इंदापूर ता.08 सप्टेंबर 2025
पाच वर्षापेक्षा जास्त सेवा बाकी आहेत अशा सर्व शिक्षकांनी सेवेत राहण्यासाठी तसेच पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा द्यावी, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने नुकताच दिलेला आहे. याबाबतीत शिक्षकांनी अजिबात अस्वस्थ होऊ नये, काळजी करू नये, असे शिक्षक भारतीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
सदर प्रकरण एका अल्पसंख्यांक संस्थेबाबतीत होते. अल्पसंख्यांक संस्थेमध्ये नियुक्ती देताना शिक्षकांना टीईटी आवश्यक असावी का नसावी याबाबतची याचिका मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर माननीय न्यायालयाने सरसकट सर्वच शिक्षकांना टीईटी आवश्यक असल्याबाबतचा खळबळजनक निकाल नुकताच दिलेला आहे.
देशातील ६ ते १४ या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण अनिवार्य करणाऱ्या शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने १ एप्रिल २०१० पासून केली. या कायद्यातील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक व व्यवसायिक अर्हता निश्चित करताना २३ ऑगस्ट २०१० च्या अधिसूचनेनुसार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी बंधनकारक केलेली आहे. यानंतर राज्य सरकारने १३ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयानुसार ही अधिसूचना राज्यांम ध्ये लागू केली. टीईटी बाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय ही एक कायदेशीर बाब असून या विरोधात कायदेशीरच लढाई लढावी लागणार आहे. याबाबतीत अद्याप केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. शासनाने याबाबतीत अधिकृत भूमिका घेतल्यानंतर
शिक्षक भारती या विरोधात कायदेशीर लढाई आणि रस्त्यावरील लढाई लढायला तयार आहे असे शिक्षक भारतीच्या राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी आश्वासन दिलेले आहे. याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट होताच शिक्षक भारती शिक्षकांच्यासाठी काय करता येईल याबाबत नुकत्याच पार पडलेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. वेळ पडल्यास शासनावर दबाव आणणे, विधी तज्ञांची टीम तयार ठेवणे, शासनाबरोबर चर्चा करणे अशा अनेक गोष्टींवर विचार विनिमय करण्यात आलेला आहे.
शासनाची भूमिका समोर येत नाही तोपर्यंत शिक्षकांनी जास्त विचार करू नये, असे आवाहन शिक्षक भारतीचे नेते मा. आ. कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केले आहे.अशी माहिती शिक्षक भारतीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे, जिल्हा प्रवक्ते विजयकुमार गुंड यांनी दिली
![]()