
इंदापूर तालुक्याच्या खडकवासला कालव्याचे उन्हाळी आवर्तन तात्काळ सुरू करा
तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाची खडकवासला पाटबंधारे विभागाकडे मागणी
लोकमराठी News, इंदापूर ता.03
इंदापूर तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खडकवासला कालव्यातून मिळणाऱ्या पाण्याचे उन्हाळी आवर्तन तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व माजी सभापती प्रविण माने व भाजप नेते प्रदीप गारटकर यांच्या सहशिष्ट मंडळाने खडकवासला पाटबंधारे विभागाकडे केली आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत माहिती देताना प्रवीण माने व प्रदीप गारटकर म्हणाले,इंदापूर तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेती पिकांसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. तालुक्यातील अनेक गावांची शेती पूर्णतः कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असून पाणी उपलब्ध नसल्याने ऊस, डाळिंब, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिके धोक्यात आली आहेत.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी विहिरी आणि बोअरवेलचे जलस्तरही खालावले आहेत. काही भागांमध्ये विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतीबरोबरच ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनावरही परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत प्रविण माने यांनी प्रशासनाला परिस्थितीची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन केले असून, शेतकरी आणि नागरिकांच्या हितासाठी खडकवासला कालव्याचे उन्हाळी आवर्तन तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
यावेळी आकाश कांबळे, मारुती वनवे, गजानन वाकसे ,अनिल पवार,गणेश राऊत, किरण गानबोटे, तेजस देवकाते, राजकुमार जठार, यशवंत कचरे, राम आसबे, अतुल शेटे पाटील,बाळासाहेब पानसरे, संजय शिंदे, वसीम बागवान,सचिन शिरसट यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या मागणीला तालुक्यातील अनेक शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे. मागणीपत्रावर विविध गावांतील प्रतिनिधी व शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या असून, पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.–
• खडकवासला हक्काच्या पाण्यापासून इंदापूर तालुक्यातील शेतकरी वंचित,• तीव्र पाणीटंचाईमुळे शेतकरी चिंतेत,• ऊस, डाळिंब व भाजीपाला पिकांना पाण्याचा फटका,• अनेक विहिरी व बोअरवेल कोरड्या पडण्याच्या मार्गावर• ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र• खडकवासला कालव्याचे आवर्तन सुरू करण्याची एकमुखी मागणी–
छायाचित्र – पुणे पाटबंधारे विभाग कार्यालय येथे खडकवासला कालव्यातून इंदापूर साठी तात्काळ पाणी सोडण्यात यावे या मागणीचे प्रशासनास निवेदन देताना प्रवीण माने प्रदीप गारटकर व इतर मान्यवर…
![]()